#द्रुत
शहरांची बेसुमार वाढ झाली.आस्तित्वात असलेल्या रस्त्यावर गर्दी मावेनाशी झाली.रस्त्यावर वाहने सोडा चालणेही मुश्किल झाले.गरज ही शोधांची जननी असते असे म्हणतात त्याप्रमाणे काही नव्या रस्त्यांची आणि महामार्गाची निर्मिती झाली या रस्त्यांवरून फक्त वेगवान वाहने जाऊ शकत होती.आधी असलेल्या वेगवान गतीला अती वेगवान अर्थात द्रुतगती बनवून दोन शहरातील प्रवासाचा वेग वाढला आणि अर्थातच वेळ कमी झाला.हे द्रुतगती मार्ग देशातील दळणवळण यंत्रणेचा महत्वाचा भाग झाले.अतिजलद महामार्गामुळे मालवाहतुकीला द्रुतगती आली.एरवी प्रचंड गर्दी असलेले हे महामार्ग महामारीच्या पार्शवभूमीवर बंद झाले आणि ओस पडले.
कधी कल्पना केली होती का की द्रुतगती मार्गही कधी थांबेल? एका अदृश्य विषाणूने हे करून दाखवले आहे. गती ते द्रुतगती आणि अचानक सद्गती मिळाल्यासारखे हे मार्ग ठप्प झाले. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर निसर्गाला दिलेले आव्हान एका क्षणात संपले.
याचाच दुसरा अर्थ आहे की कोणतीही गोष्ट द्रुत करू शकतो या माणसाच्या गर्वाचे घर निसर्गाच्या इशाऱ्यासरशी खाली झाले आहे.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट नैसर्गिक गतीने होणे कधीही चांगले;पण माणसाला प्रत्येक गोष्ट द्रुत अर्थात घाईने हवी असते. नैसर्गिक वेगाने मिळालेल्या गोष्टींचा आनंद काही और असतो;पण मानवी वृत्तीने प्रत्येक क्षेत्रात वेग आणला गेला आगे. हा द्रुतचा हव्यास एक दिवस त्याला अडचणीत आणणार हे निश्चितच होते आणि ती वेळ आली आहे....
द्रुतगती स्तब्ध झाली आहे...
कोरोनामुळे!
.... ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020