मन करा रे प्रसन्न

मन चंचल असते, मन सैरभैर फिरते, मन क्षणात इथे असते तर क्षणात दूरवर कुठं तरी फिरून येते. मनाचा वेध आणि वेग आजपर्यंत कोणालाही साधता आले नाही. आपले मन आपल्या भलाचा विचार करतेच पण इतरांच्या भल्याचा विचार करणारे मन सर्वात सुंदर असते. असे म्हटले जाते की सुंदर तन काही कामाचे नाही जर आपले मन सुंदर नसेल तर. म्हणून आपले मन सुंदर राहण्यासाठी मनात चांगले विचार येऊ द्यावे, सकारात्मक विचार करावे, दुसऱ्यांना त्रास, ईजा होईल असे विचार आपल्या मनात कधीच येऊ नये याची काळजी घ्यावी. आज देशात ज्या काही अप्रिय अशा घटना घडतांना दिसून येत आहेत त्यामागे सर्वस्वी कारण आपले मन आहे. कणखर आणि मजबूत मनात कुणाचे वाईट करावे असे येतच नाही. मनाला मजबूत बनविण्यासाठी योगा करणे आवश्यक आहे. आपल्या मनाला काहीतरी विरंगुळा ठेवावे, आवडीचे गाणे ऐकावे, चित्रपट पहावे, पुस्तक वाचावे, लेखन करावे, कविता लिहावी म्हणजे मनाला आत्मिक समाधान मिळेल. कुणासोबत शक्यतो वादविवाद टाळावे, राग येईल असे काही वर्तन करू नये म्हणजे मन शांत राहील. डोळे-कान हे दोन महत्वाचे इंद्रिय आहेत जे की आपल्या मनाला हवे ते सुख-शांती देऊ शकतात. तेव्हा त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्या डोळ्याला वाईट पाहण्याची व कानाला वाईट ऐकण्याची सवय लागली की मन देखील तसेच वागते. माणूस जेव्हा एकटा राहतो त्यावेळी त्याच्या मनात नानाप्रकारचे विचार येतात. तुम्ही जर सुखात किंवा आनंदात असाल तर त्याच प्रकारचा विचार कराल पण दुःखात किंवा काळजीत असाल तर जीवाचे बरे-वाईट करून घेण्याचा विचार मनात घुटमळत राहतो. मग त्यातूनच आत्महत्त्येचे प्रकार घडत असतात. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. प्रत्येकजण आपापल्या घरातच कैद आहेत. घरातील वाढत चाललेले वास्तव्य देखील कुटुंबाला एका वेगळ्या वळणावर नेत असल्याच्या चीनमधील बातम्या वाचण्यात आल्या होत्या. तश्याच काही बातम्या भारतात देखील वाचण्यात आले आहेत. कोरोना पॉजिटिव्ह अहवाल आल्यानंतर व्यक्तीच्या मनाची घालमेल जास्त वाढत आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार लोकं कोरोना रोगाने कमी आणि त्याच्या धसकीने जास्त मृत्यू पावत आहेत. म्हणून कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या मनाचे संतुलन ढळू द्यायचे नाही. काही समुपदेशन करणाऱ्या मित्रांच्या मदतीने आपल्या कमजोर बनत चाललेल्या मनाला मजबूत करायला हवे. आजच्या या काळात तर आपले मन भक्कम ठेवणे अत्यावश्यक आहे. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण हे संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेले वचन नेहमी लक्षात असू द्यावे. आपण अंधारात चालताना नेहमी देवाचे नामस्मरण करीत चालत असतो. कारण त्यावेळी आपल्या मनाला सांगत असतो की, भिऊ नको तू एकटा नाहीस तर तुझ्यासोबत अजून कुणीतरी आहे. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना एकच वचन देतात ते म्हणजे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नुसते कोणी सोबत आहे असे जरी म्हटले तरी आपणाला तेवढी भीती वाटत नाही. म्हणूनच आपल्या मनाला कधी ही एकटे ठेवू नका. त्याला सदोदित कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त करून ठेवावे. म्हणजे आपल्या मनाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर विचार करायला वेळ मिळणार नाही. रिकाम्या डोक्यात भूतांचे वास्तव्य असते आणि ते आपल्या मनाला नको असलेले काम करायला भाग पाडते. सदा असतो जो कामामध्ये, उत्साह दिसतो त्याच्या चेहऱ्यामध्ये आणि जो काम न करता आळस करतो त्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत नाही. संत बहिणाबाई चौधरी यांनी देखील मन वढाय वढाय असे म्हटले आहे. चला तर आपल्या मनाला सदा प्रफुल्लीत ठेवू या आणि निरोगी व आनंदी जीवन जगू या.

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Marathi Thought by Na Sa Yeotikar : 111518127

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now