कोंबड्याचा व्यवसाय
पूर्वीच्या काळी म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी प्रत्येकांच्या घरी कोंबड्या पाळले जायचे. शेळीपालन जरासे जिकरीचे जाईल किंवा त्याला एखादा व्यक्ती ठेवावे लागेल पण कोंबड्या पाळण्यासाठी विशेष असे कष्ट लागतच नाही. कोंबडी अंडी देते, ते अंडी जेवढे विकता येतील तेवढे विकायचे, खाऊ वाटतील तेवढे खायचे आणि राहिलेले अंडी उबविण्यासाठी ठेवायचं. कोंबडी अंडी देणे बंद केलं की तिला अंड्यावर बसवायचं. बरोबर 20-21 दिवसानी मग कोंबड्याच्या पिलांचा आवाज येऊ लागायचं. कोंबडी आपल्या लहान लहान पिलांना घेऊन अंगणात इकडे तिकडे फिरायची. आपल्या पिलांची ती काळजी ही घ्यायची आणि संरक्षण देखील करायची तरी देखील काही पिल्ले मांजरीच्या घशात तर काही पिल्ले घारीच्या तोंडात जायची. एवढ्या संकटातून जे जगले ते आपले, मांजर, घार, कुत्री यांच्या तोंडात गेले त्याला काही करता येत नाही. सायंकाळ झाली की कोंबडे आपल्या खुराड्या कडे वळतात. त्यांना झाकून ठेवायचं काम मात्र करावे लागते. घरातील लहानसहान मुले हे काम आनंदाने करतात. अशा रीतीने एकाचे दहा आणि पुन्हा दहाचे पाच-पंचवीस कोंबड्या वाढतच राहतात. घरी कोणी पाहुणा आला म्हटलं की एखाद्या कोंबड्यावर वेळ यायची आणि त्यादिवशी तिचा बलिदान दिला जायचा. पैसे लागत नव्हते काही नाही त्यामुळे घर की मुर्गी दाल बराबर अशी स्थिती होती. कोंबडा आरावला की सकाळ झाली असे समजायचं. ना घड्याळ होते ना किती वाजले याचे गणित होतं. आज मात्र सर्व परिस्थिती बदलून गेली. आज गावात तर कोंबड्या कमी झाल्याच शिवाय कोंबडे पाळणारे लोकं ही कमी झाले आहेत. माझ्या अनुभवावरून सांगतो की, आज ही गावरान कोंबड्या पाळणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. पोल्ट्री किंवा बॉयलर सारखे कोंबड्या पाळण्यापेक्षा गावरान कोंबड्या पाळणे केंव्हाही चांगले. त्याला योग्य आणि चांगला भाव मिळतो तसेच जनतेचे आरोग्य देखील सुरक्षित राहते. मात्र झटपट कमाई आणि लवकर श्रीमंत होणे या लोभापायी मनुष्य विचार न करता पोल्ट्री फॉर्म उघडून बसला आहे. जे व्यवसाय आपण करतो त्याची चव कधी आपणा स्वतःला घेता यावी असा व्यवहार करणे गरजेचे आहे. आजच्या बेरोजगार युवकांनी आणि शेती करणाऱ्यानी शेती करत करत असे छोटे छोटे असे उद्योग देखील करावे म्हणजे हातात पैसा खेळत राहील आणि मन सदा प्रसन्न राहील.
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769