#MORALSTORIES
यश भर उन्हातून राजू आपल्या आजोबांबरोबर आपल्या वार्षिक परीक्षेचा रिपोर्ट कार्ड आणण्यासाठी शाळेत जात होता. तरी उन्हात सुद्धा राजू आपल्या पडलेल्या सावली बरोबर खेळत खेळत चालत होता. राजू त्या सावलीला पकडण्याचा प्रयन्त करत होता. परंतु त्याच्या बरोबर त्याची सावली सुद्धा पुढे पुढे सरकत होती. हे बघून राजुने आपल्या आजोबांना विचारले " आजोबा, ही सावली मला पकडता का येत नाही----? " परंतु शाळेजवळ आल्याने आजोबांनी राजुच्या प्रश्नाचे उत्तर न देताच सरळ शाळेच्या गेट मध्ये प्रवेश केला. बरीच गर्दी होती. त्या गर्दीतच राजुने बघितले कि त्याचा मित्र विकास पहिल्या नंबरमध्ये येऊन सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे विकासचे सर्व मित्र अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव करत होते.
गर्दी बरीच असल्याने रिपोर्ट मिळण्यास दोन तास लागले.राजू एका विषयात दोन गुणांनी नापास होता. तरीसुद्धा त्याला दोन गुण देऊन वर चढवले होते. हे आजोबांकडून कळले तेव्हा राजू फारच उदास झाला. त्याच उदास चेहऱ्याने राजू आजोबांचा हात धरून घरी परतत होता. ऊनही बरेच कमी झाले होते. आजोबांनी राजुचा मूड नीट करण्यासाठी त्याला विचारले " राजू, आपण शाळेत जातेवेळी तू तुझ्या सावलीला पकडत होतास नं---? आता कुठे गेली ती सावली---? " राजू सुद्धा इकडे तिकडे बघू लागला. परंतु त्याला सावली दिसली नाही. म्हणून आजोबांनीच सांगितले कि " राजू बेटा, आता सावली तर तुझ्या पाठी पाठी येत आहे." हे बघून राजूलाही कौतुक वाटले. "राजू बेटा, मार्क्स कमी पडले म्हणून उदास नं होता चांगला अभ्यास कर. ही सावली म्हणजे हे तुझे यश आहे असे समज. त्यासाठी तुला त्याच्या पाठी धावायची गरज नाही तर तुझ्या कर्तृत्वाने हीच यशरूपी सावली तुझ्या पाठी पाठी येईल आणि तुझ्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होईल.